गोलाकर्जी गावातील पूरग्रस्तांना व गरीब कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तूंची मदत

47

 

जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण विभाग म्हणजे अहेरी व सिरोंचा या भागात पूर परिस्थिती निर्माण झाली. त्यात अहेरी व सिरोंचा तालुक्यातील बऱ्याच भागातील जनजीवन विस्कळीत झाले.त्यात सर्वांचे घर, घरातील दैनंदिन आवश्यक वस्तू, मुलांचे शैक्षणिक वस्तू यांचे खूप नुकसान झाले. त्यामुळे त्यांना जीवन जगण्यास संघर्ष करावा लागला. तेव्हा गडचिरोली पोलीस दलातर्फे पुरात अडकून पडलेल्या लोकांना वाचविणे,त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचविणे,इत्यादी कार्य मोठ्या प्रमाणात करण्यात आले.

 

पुरामुळे सर्व संसार उपयोगी साहित्य वाहून गेले,त्यांना पुन्हा उभा करण्यासाठी आपल्या गडचिरोली पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार रवींद्र कंकलवार यांनी एक मदतीचा एक छोटासा प्रयत्न म्हणून मित्र-परिवाराकडून, परिचयातील व्यक्तींकडून,पोलीस सहकाऱ्यांकडून व गडचिरोली जिल्ह्यात कर्तव्य बजावून गेलेल्या अधिकाऱ्यांकडून जीवनावश्यक वस्तू जमा करून सर्व जीवनावश्यक वस्तू चे वाटप करण्यात आले.

अहेरी तालुक्यातील गोलाकर्जी या गावातील ०७ पुरग्रस्त कुटुंब व ०९ गरीब कुटुंबातील सदस्यांना प्रत्येकी ०१ ब्लॅंकेट, शर्ट-पॅन्ट, साडी,लुगडा,शाल, स्वेटर व लहान मुलांकरिता शैक्षणिक साहित्य त्यामध्ये ०१ शालेय बॅग, ०२ नोटबुक,पेन,पेन्सिल आणि कंपास इत्यादी साहित्य वाटप केले.सदर साहित्य उप पोलीस स्टेशन राजाराम खांदलाचे प्रभारी अधिकारी व त्यांच्या टीमच्या सहकार्याने वाटप करण्यात आले.

साहित्य वाटपाच्या वेळी रविंद्र कंकलवार यांची पत्नी करिश्मा कंकलवार त्यांचा मुलगा देवांश कंकलवार व त्यांचे मित्र पंकज खोब्रागडे हे उपस्थित होते.त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.